औरंगाबादेत मंडप गोडाऊनला भीषण आग

औरंगाबाद : २७ फेब्रुवारी : शहरातील मिटमिटा परिसरात काल रात्री भीषण आग लागली. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. तब्बल दोन तास अथक परिश्रमानंतर आग विझवण्यात यश आले.
मिटमिटा भागात रविवारी रात्री दहा वाजेचे सुमारास ७ एकर परिसरात पसरलेल्या जाधव मंडपाचे गोडाऊनला अचानक आग लागली. त्यावेळी मोठी खळबळ उडाली.
आग वाढत गेल्याने फायर ब्रिगेडच्या दहाहून अधिक गाड्यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. पदमपुरा अग्निशमन दलाच्या ५, सिडको १, चिखलठाणा १, वाळूज एमआयडीसी १, बजाज १, गरवारे १ अशा एकूण १० फायर ब्रिगेडच्या गाड्या बोलवण्यात आल्या होत्या.
आग लागल्यानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अनेकांनी आग विझवण्यात, सामान बाहेर काढण्यात मदत केली. मात्र एकापाठोपाठ सायरन वाजत येणाऱ्या फायर ब्रिगेड च्या गाड्यांमुळे नेमके काय झाले असेल असे म्हणत इतर नागरिकांमध्ये खळबळ उडाली होती.
औरंगाबादेत जाधव मंडप हे नाव मंडप व्यवसायातील अग्रगण्य नाव आहे. आपले साहित्य ठेवण्यासाठी त्यांनी मिटमिटा परिसरात ७ एकर मध्ये आपला गोडाऊन उभारला आहे. या गोडाऊनमध्ये ते मंडपाचे कापड, खुर्च्यांसह इतर साहित्य ठेवतात. त्यामुळे या आगीत त्यांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. मात्र अजून नुकसानीचा आकडा समोर आलेला नाही.
आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर कुलींग करण्यात येत होते. आज पोलीसांकडून पंचनामा करण्यात येणार आहे. त्यानंतर नुकसानीचा आकडा स्पष्ट होईल.